नवजात बालकांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करा ! ‘धर्मराज्य पक्षा’ची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी.
‘धर्मराज्य पक्षा’ची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी.
ठाणे (प्रतिनिधी) : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात आग लागून दहा चिमुकल्या बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची काळीज पिळवटणारी घटना ९ जानेवारी-२०२१ रोजी घडली. या दुर्घटनेमुळे फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर अवघा भारत देश हळहळलेला आणि हादरलेला असून, सर्वत्र शोककळा पसरलेली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात घडलेल्या या दुर्दैवी घटनेला निव्वळ रुग्णालय प्रशासनच नव्हे, तर त्यासोबतच महाराष्ट्र शासनाच्या सुरक्षा व आग प्रतिबंधक धोरणांसंदर्भातील राज्य शासनाचा हलगर्जीपणादेखील तेवढाच जबाबदार असल्याचा थेट आरोप ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने करण्यात आला असून, या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या रुग्णालय प्रशासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या एका पत्राद्वारे केली आहे.
दरम्यान, रुग्णालयीन इमारतींची कमाल उंची वाढविण्यासाठी ‘महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवरक्षक उपाययोजना अधिनियम-२००६’ यातील दुरुस्ती, तसेच विधिमंडळात संमत केलेले अधिनियम याबाबत फेरविचार करण्याबाबतचे पत्र ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने दि. ११ मे-२०१५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले होते. मुंबईतील काळबादेवी परिसरातील ‘गोकुळ निवास’ या इमारतीस लागलेल्या आगीत मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी मृत्युमुखी पडले होते. त्याआधी बोरिवली व ठाणे येथील दुर्घटनेतदेखील, अग्निशमन दलाचे कर्मचारी कर्तव्य बजावत असताना, शहिद झाले होते. महाराष्ट्र शासनाने रुग्णालयांच्या इमारतींची उंची ३० मीटरवरुन, ४५ मीटर इतकी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, तो चांगलाच वादग्रस्त ठरला होता. मुळात ‘रुग्णालय व आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम-२००६’मधील तरतुदी शिथिल केल्यामुळेच भंडारा येथील दुर्घटना घडल्याचा थेट आरोप नितीन देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे.
दरम्यान, दि. २९ डिसेंबर-२०१७ रोजी मुंबईतील लोअर परळ परिसरातील कमला मिलमधील ट्रेड हाऊस या इमारतीच्या पब-रेस्टॉरंटमध्ये घडलेल्या अग्नितांडवात १४ जणांचा गुदमरून मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतरही, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने दि. ३० डिसेंबर-२०१७ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा दुसऱ्यांदा पत्र पाठविले होते. या पत्रातदेखील, ‘महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम-२००६’मध्ये केलेल्या दुरुस्तीबाबत फेरविचार करण्याबाबतची विनंती करण्यात आली होती. मात्र, त्याहीवेळी ‘त्या’ मागणीकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर ‘धर्मराज्य पक्षा’ने अत्यंत उद्वेगजन्यपणे मागणी केली आहे की, भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्नितांडवात बळी पडलेल्या निष्पाप-नवजात बालकांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या, रुग्णालय प्रशासन व महाराष्ट्र शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच ‘रुग्णालय व आग प्रतिबंधक जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम-२००६’मधील तरतुदी शिथिल करणाऱ्या समितीमधील अधिकाऱ्यांची चौकशी करुन, त्यामागची नेमकी कारणं काय आहेत? याचा तपास करावा आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करून, त्यासंदर्भात कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
Comments
Post a Comment